Subscribe Us

श्री शिवलीलामृत अध्याय २ || श्रीशिवलीलामृत कथासार || shivlilamrut adhyay 2 || शिवलीलामृत अध्याय दुसरा

॥ श्रीशिवलीलामृत कथासार ॥

अध्याय २

व्याध -हरणाची कथा

भाग :-२

              ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याची नेहमी निर्भर्त्सना करतात त्या पुढील जन्मात दासी बनतात. जे सेवक आपल्या धन्याचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो. नोकरापासून रोजच्या रोज भरपूर काम करून घेऊन जो धनी त्याला ठरलेला पगार देत नाही, तो पुढील जन्मी भिकारी होऊन भीक मागत दारोदार हिंडू लागतो. पतिपत्नींचा सुखाचा चाललेला एकांत जो चोरून बघतो त्याची स्वतःची बायको पळून जातो आणि शेवटी तो अन्नाला महाग होतो. जे दुसऱ्यावर करणी करतात ते भूत बनतात, पिशाच्च बनतात. जी स्त्री मासिक धर्माचा विटाळ घरात कालवते तिचे पूर्वज नरकात पडतात. तिच्या घरी देव किंवा पितर कधीही पाय ठेवीत नाहीत. देवाच्या देवळातील दिव्याचे तेल जे चोरून नेतात त्यांना जन्मात कधी पुत्र होत नाही. घरात स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया नेहमी चोरून खातात त्या पुढील जन्मात मांजरी बनतात. आपल्या घरी आलेल्या अतिथीला शिळेपाके खायला घालून आपण स्वतः पंचपक्वान्नांचे जेवण करणाऱ्या स्त्रियांचे त्यांच्या पोटात राहिलेले गर्भ आपोआप गळून पडतात. जी मुले आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी छळतात त्यांना मृत्यूनंतर माकडाचा जन्म प्राप्त होतो. आपल्या सासू-सासऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांना होणारी मुले जगत नाहीत.


            तरी हे व्याधा, मी जर घरी जाऊन येथे परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील, अशी मी शपथ घेते. आता मला घरी जाण्याची तू परवानगी दे. तू तेव्हा व्याध हरिणीला म्हणाला, "हे पतिव्रते, तू आता घरी जा... आणि रात्र संपायच्या आत परत ये. 'व्याधा, तू खरोखरच पुण्यवान आहेस. तुला तो कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल. मी घरी जाऊन परत येते. " असे म्हणून हरिणी तेथून निघून गेली.

         झाडाच्या फांदीवर बसल्याबसल्या वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून आपल्या समोरची बिल्वदले उजव्या हाताने खोडून व्याध आता खाली टाकतच होता. दोन प्रहर रात्र झाली होती. व्याधाने केलेल्या पापांपैकी त्याच्या या कृत्यामुळे अर्धी पातके नष्ट झाली होती. 'हर हर' या नावाची आता व्याधाला आवड उत्पन्न झाली होती. तो आता तोंडाने 'सांब सदाशिव हर हर महादेव' असे म्हणत म्हणत समोर टक लावून बघत होता. जागरण अनायसेच घडत होते. तेवढ्यात त्या अंधुकशा प्रकाशात व्याधाला पुन्हा जनावराची चाहूल लागली. आता ही शिकार आपण साधायचीच असे मनाशी ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला. खरेच तेथे आता दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आलेली होती. शिकार करण्यास तयारीत टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, तू बाण सोडू नकोस. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही, असे म्हणतात. मी पतिसहवासासाठी अतिशय आतुर झालेले आहे, माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झाले आहे. मला थोडा वेळ माझ्या घरी पतीकडे जाऊ दे, पतीला भेटून मी लगेच परत येते. "

               आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून व्याध तिला म्हणाला, " हे हरिणी तुम्ही सर्व जणी खरोखरच भाग्यवान आहात. तू घरी जाऊन जरूर पतीला भेटून ये; पण जाण्यापूर्वी तू शपथ घेऊन जा. तुला तर शास्त्र-पुराण सर्व काही माहीत आहे. तेव्हा आधी शपथ घे आणि मगच घरी जा.

            व्याधा, विहिरी, तळी, सरोवरे, देवळाभोवतालची बाग इ. पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला लागणारे महत्पाप मी परत आले नाही तर मला लागेल. लढवय्या क्षत्रिय असूनही जो युद्धाला भिऊन पाठ दाखवून समरांगणातून पळ काढतो, वेदशास्त्र यांची सतत निंदा करतो, महापुरुषांनी लोक-हितास्तव जे पवित्र ग्रंथ लिहिले आहेत, त्यांचीही निंदानालस्ती जो करतो, संत, ऋषी, भक्त यांचा नेहमी द्वेष करतो, भगवान शंकर आणि जगप्रतिपालक विष्णू यांची चरित्रे खोटी आहेत असे म्हणतो, त्याची पापे जर मी परत इथे तुझ्यासमोर आले नाही तर माझ्या मस्तकावर चढतील. " हे निषादा, आपला पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे करीत असतानाही जे त्यांना सतत त्रास देतात, छळतात, ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात. त्यांना कुणी भिक्षा वाढायलादेखील तयार होत नाही. जे भाऊ सारखे आपसात भांडत असतात त्यांना पुढचा जन्म माशांचा येतो. जो आपल्या गुरूचे उणे काढून मित्रमंडळींमध्ये चर्चा करीत रहातो त्याची सर्व संपत्ती नष्ट होते. जे वाटसरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म स्मशानातील डोंबाचा येतो आणि प्रेतावर घातलेली वस्त्रे ते नेसतात, पांघरतात. 

            साधुपणाच्या नावाखाली दांभिकपणाने जे अनाचार करतात त्यांना मृत्यूनंतर घुल्यांचा जन्म येतो. जी दासी स्वामीची मनापासून सेवा करीत नाही तिला मगरीचा जन्म प्राप्त होतो आणि जो स्वतःच्या कन्येची विक्री करून संपत्ती मिळवतो त्याला नंतर हिंस्र पशूचा जन्म प्राप्त होतो. आपल्या पतीची मनापासून नित्यनेमाने सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो सारखा त्रास देतो त्याला जन्मोजन्मी अनंत यातना सोसाव्या लागतात. जो ब्राह्मण असूनसुद्धा दूध-ताक-रस विकील तो पुढील जन्मी मद्यपी होतो. विद्वान अशा ब्राह्मणांचा जो मुद्दाम अपमान करीत असतो तो नंतरच्या जन्मात ब्रह्मराक्षस होतो. दुसऱ्याने त्याच्यावर केलेला उपकार ज्याला परत आठवत नाही त्याला विष्ठेतून पडणाऱ्या जंताचा घाणेरडा जन्म येतो. 
      
                     जो ब्राह्मण कोठे श्राद्धपक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी स्त्रीसमागम करतो त्याला मृत्यूनंतर कुत्र्याचा, डुकराचा जन्म येतो. जो मुद्दाम जाणूनबुजून खोटी साक्ष देतो त्याचे सर्व पितर नरकात जातात. दोन स्त्रियांशी विवाह करून तो त्यांतील फक्त एकीवर जास्त प्रेम करतो त्याला पुढील जन्म गोचिडाचा येतो. जो कोणी पाणी मुद्दाम अडवून ठेवतो त्याला 'मलमूत्र' विसर्जन करताना त्या जागी खूप वेदना होतात. जो साधूंची, संतांची स्वतःच्या मुखाने निंदा करतो त्याचे तोंडातील सर्व दात लवकर पडून जातात. जो कोणी देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोगाची बाधा होते.

                   'जो आपल्या राज्याच्या राजाची निंदा करतो त्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही. ग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळातच जो जेवण करतो त्याला पित्तरोग होतो. दुसऱ्याची लहान लहान मुले पळवून नेऊन दूर देशात विकतो त्याला महारोग होतो. जी स्त्री मुद्दाम राहिलेला गर्भ पाडते ती पुढील जन्मी वंध्या होते. जो पवित्र अशा देवालयाची मोडतोड करतो त्याचे हातपाय मोडतात. आपल्या पत्नीचा काहीही अपराध नसताना तिला जो पती सारखा छळतो त्याला अर्धांगवात होतो. जो ब्राह्मणाचे हातचे अन्न हिसकावून घेतो त्याचा वंश कधीही वाढत नाही. म्हणजे तो निर्वंश होतो. गुरु, संत आणि आई-वडील ह्यांची जो कारणाशिवाय किंवा कारणपरत्वे निंदा करतो त्याच्या बोलण्यात दोष उत्पन्न होऊन तो तोतरा होतो आणि बोलताना सदोदित अडखळतो जो ब्राह्मणाला अकारण मारहाण करतो त्याच्या सर्व शरीरात भयंकर असे रोग उत्पन्न होतात. देवालयातले लावून जोपासलेले मोठमोठे वृक्ष जो तोडतो तो पायाने पांगळा होतो. 

                   संसारात जो एकटाच चैन करतो, रंगेलपणे वागतो, दुसऱ्याची कोणत्याही गोष्टीसाठी पर्वा करीत नाही त्याच्या अंगाला अत्यंत दुर्गंधी येईल असा भयंकर रोग होतो. ब्राह्मणाकडून घेतलेले कर्ज तो मुद्दाम फेडत नाही त्याचा बाप त्याच्या पुढील जन्मात त्याच्या अगदी लहानपणीच मरतो. जो कधीही कुणाला दान करत नाही तो पुढील जन्मी अन्नासाठी सर्वत्र वणवण करीत फिरतो. जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलाचाच द्वेष करतो तसेच एखाद्या दरिद्री माणसाचे ठरत असलेले लग्न मोडतो त्याच्या पत्नीला पुढील जन्मात मूल होत नाही. तिच्या पोटात गर्भाऐवजी नुसताच गोळा वाढतो. जो पवित्र कथा कधी ऐकत नाही तो कानांनी बहिरा होतो. आईवडिलांना त्रास देणाऱ्याचे कार्य कधीही पूर्ण होत नाही. फक्त एकच एक देव श्रेष्ठ मानणाऱ्याला फक्त एकच मुलगा होतो. जो गोवध करतो त्याला पुढच्या जन्मात भांडकुदळ बायको मिळते. जो बैल मारतो त्याचा मुलगा मूर्ख निपजतो. मुक्या जनावराचे अन्नपाणी विनाकारण किंवा उद्दामपणाने जो तोडतो त्याला मुकी मुलेच होतात. जो दुसऱ्याच्या पतिव्रता स्त्रीवर डोळा ठेवतो त्याला अतिशय कुरूप आणि तोंडाळ बायको मिळते. जो आपल्या ज्ञानी अशा गुरूचा त्याग करतो तो पुढील जन्मी जन्मतःच मृत्यू पावतो. जो सूर्यासमोर तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणीच सर्वच्या सर्व दात पडतात आणि डोक्याचे केस पांढरे होतात. आपल्या मृत बाळासाठी शोक करीत असणारांना जे कुत्सितपणे, विनोदाने किंवा उपरोधाने हसतात ते निपुत्रिक होतात.

                   व्याधा, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील. असे मी तुला शपथ " घेऊन सांगते. तिचे व्यवहारकुशल, विद्वत्तापूर्ण व कळकळीचे हे बोलणे ऐकून, "बरं जा... पण लवकर ये,” असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली. तिला जाण्यास परवानगी मिळताच जलपान करून उड्या मारीतच ती निघून गेली.

                तेवढ्यात एक सुंदर हरीण त्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. व्याघ्राने सावध होऊन आपले धनुष्य सावरले. त्याने धनुष्याला बाण लावताच त्याला हरिण म्हणाले, "निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया या अत्यंत पतिव्रता आहेत. त्यांना विचारून मी परत येथे तुझ्यासमोर येतो, मी तशी शपथ घेऊन जातो. "

                 'रंगात येऊन एकरूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो माहीत असूनही व्यत्यय आणतो त्याचा वंशवेल कधीच वाढत नाही. आपापले नेमलेले नेहमीचे काम सोडून जो दुसऱ्या जातीचे काम करू लागतो तो कायम नरकात पिचत पडतो. पवित्र स्थानांची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या लोकांचे जो द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावर असंख्य असे व्रण पडतात आणि तो कायमच्या नरकयातना भोगतो. जो एकादशी, शिवरात्र असे उपवास जाणूनबुजून करत नाही त्याचे हातपाय लौकरच थकतात. शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हाताने फोडणारा, भक्तांना काहीना काही त्रास देणारा, शिवमहिमा कधीही न मानणारा नरकातला किडा होतो.. आपल्या आईवडिलांना त्रास देणारा पिशाच्च होतो. आपल्या गुरूचा द्रोह करणारा लगेच मरून जातो आणि भूतयोनीत जाऊन अतिशयच कष्ट भोगतो. ब्राह्मणांचा आहार केवढा मोठा आहे असे म्हणून हसणाऱ्याच्या तोंडात किळस वाटावी असा रोग होतो व त्याला काहीही अन्न खाता येत नाही.

                   घरची गाय विकणारा, आपल्या कन्येचा विक्रय करणारा पुढच्या जन्मात मांजर होतो आणि त्या रूपात आपली मुले आपण भक्षण करतो. जो आपल्या सख्ख्या बहिणीकडे, पोटच्या मुलीकडे किंवा पतिव्रता परस्त्रीकडे कामदृष्टीने पहातो त्याला प्रमेह नावाचा भयंकर रोग होतो. देवाची भांडी, अलंकार चोरणाऱ्याला पंडुरोग होतो. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या मित्राचा विश्वासघात करणाऱ्याला, आपल्या जन्मदात्या आईवडिलांची हत्या करणाऱ्याला, आपल्या गुरूला संकटात लोटून देणाऱ्याला लगेचच या व पुढल्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात, हे सत्य आहे हे तू जाणतोस. अंगात सामर्थ्य असूनही जो गोवध किंवा ब्राह्मण-वध थांबवत नाही. ब्राह्मणाला घराबाहेर उपाशी बसवून स्वतः आतमध्ये पंचपक्वान्नांचे जेवण करतो, त्याला पोटातला आजार होतो. आणि त्यामुळे खाल्लेले जेवण पचतच नाही. जो शिवकीर्तन ऐकताना कंटाळतो, शिजपूजन कधीही व मनापासून करीत नाही त्याला कानाचा रोग होतो. तसेच, त्याला खूपच वेदना होतात, दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्यांच्या नसा, हात-पाय, कंबरेतील नसा आखडतात. व्याधा, अशा प्रकारची अनेक पापे मी जर परत आलो नाही तर मला लागतील अशी मी शपथ घेतो, तरी आता मला माझ्या घरी पत्नींच्या भेटीसाठी जाऊ दे.

                      'जा, मृगराजा, जा... पण लवकर परत ये” असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडाने 'जय शंकर, हरहर महादेव' असा नामगजर सुरू केला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. वेळ जाण्यासाठी हाताने बिल्वदले तोडून खाली टाकण्याचा चाळा सुरू होताच. शिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी त्याला रात्रभर जागरण घडले. त्याला निरूपण ऐकायला मिळाले, चार वेळा त्याच्याकडून शंकराचे पूजन झाले, त्यामुळे मागील सात जन्मांची पातकेही पूर्णपणे जळून भस्म झाली.

                      पहाट झाली. झाडावरच्या घरट्यांमधून पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेला तांबडे फुटले. साऱ्या विश्वावर लाल लाल कुंकवाचा सडाच पडला आहे अशी लाली आकाशात सर्वत्र पसरली.

            तेवढ्यात आणखी एक हरिणी त्या तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली आणि तिने मान वर करून झाडाकडे पहाताच तिला यमसारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती त्याच्याकडे केविलवाणे बघत म्हणाली, " व्याधा, मला तू मारू नकोस. माझी छोटी छोटी पाडसे घरी आहेत, ती भुकेली असतील. त्यांना अद्याप खाता येत नसल्याने ती माझे दूधच पितात. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येथे तुझ्यासमोर येते, मग तू मला मार.

                  व्याधाला तिचे ते बोलणे ऐकून फार फार आनंद झाला. कारण आता ती काय बोलते आहे ते ऐकायची त्याला उत्सुकता लागली होती. व्याध त्या हरिणीला म्हणाला, 'तू जरूर घरी जा... पण शपथ घेऊन जा... " 

                      'तर मग ऐक व्याधा, जो कोणी गुरांना खावयास चांगले आणि योग्य असलेले गवत उगीचच जाळून टाकतो, गाव उगीचच जाळून टाकतो, गाईला आणि ब्राह्मणाला पिण्यासाठीही पाणी मिळू देत नाही त्याला क्षयरोग होतो. जो ब्राह्मणांची घरे स्वहस्ते लुटतो त्याचे सगळेच्या सगळे पूर्वज नरकात पडतात. आई-मुलांत, पति-पत्नीत जो भांडणे लावून देतो, देव-ब्राह्मणांनासुद्धा जो मान देत नाही, त्यांची स्वतःच्या तोंडाने सतत निंदा करतो त्याचे यमराज हातपाय तोडतो. जो दुसऱ्याचे किंवा स्वतःचे घरी चोरी करतो, कोठे कधी साधुसंतांचा सत्कार झाला तर त्याला मनामधून फार फार वाईट वाटते, त्याला डोळ्याचे आजार होतात. त्याची दृष्टी खूप अधू बनते. जे लोकांची चांगली चांगली पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात. जे उत्तमोत्तम अशा रत्नांची चोरी करतात त्यांना अंधत्व येते. 

                    जे फार गर्व करतात त्यांना रेड्याचा जन्म येतो. भक्तांची जे उगाचच ऊठसूट निंदा करतात त्यांच्या तोंडाला बरा न होणारा असाध्य रोग होतो व दुर्गंधी सुटते, जो आपल्या आईवडिलांना मारतो तो लुळा होतो. जो स्वतःचे आयुष्यात अतिशय कंजुषपणाने वागून खर्च न करता पैसा नुसता साठवून ठेवतो, एक पैसाही खर्च झाला तर ज्याला फार वाईट वाटते तो महाभुजंग बनून दुसऱ्याच्या धनाचे नुसते रक्षण करीत बसून रहातो. आपल्या दाराशी आलेल्या भिक्षेकऱ्याला जो मुळीच भिक्षा घालत नाही त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या जमा केलेल्या सर्व संपत्तीचा नाश होतो. जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून त्या जागेवरून बाहेर घालवतो त्याच्यासारखा अधम या जगात दुसरा कुणीही नाही. व्याधा, मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर ही सर्व पातके मला लागतील. "

                हरिणीचे हे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गहिवरलेला व्याध मृदु स्वरात तिला म्हणाला, "हे माते, जा... तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून त्यांना तृप्त करून मग येथे परत ये. "

                  त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत हरिणी आपल्या बाळांकडे निघून गेली.

                       थोडा वेळ गेला. पहिली हरिणी आपल्या घरी जाऊन प्रसूत झाली होती. दुसऱ्या हरिणीने आपल्या घरी जाऊन पतिसहवास लुटला होतो. आपल्या रतिक्रीडेने पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरिणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या-छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, आत चला लवकर ! आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिला आहे. '

                        आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार.' असे छोटी पाडसेही हरणास म्हणाली आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसलेल्या त्या सरोवरापाशी आले.

             मृगराजा म्हणाला, व्याधा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत. आता तू आमची खुशाल शिकार कर; पण सर्वांच्या आधी मला बाण मार. माझा प्राण घे.

          मृगराजाला धक्का देऊन त्याच्यापुढे येत हरिणी म्हणाली, 'व्याधा, हा मृग आम्हां तिघींचा पती आहे म्हणून आधी आमचा तिघींचा तू प्राण घे, पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे, असे आपले धर्मशास्त्र सांगते.

            'व्याधा, आई-वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुले काय करणार ? त्यापेक्षा तू आधी आम्हांला मारून टाक.. आई-वडिलांना मागे सारून पुढे येत छोटे पाडस बारीक कोवळ्या आवाजात उद्गारले. आणि अशा तऱ्हेने मरणासाठी त्यांच्यात चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.

                व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरणाचे पाया पडून म्हणाला, 'मृग कुलिनांनो, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो आहे, तुमच्या सर्वांच्या तोंडून वेदान्त ऐकून माझी सर्व पातके पार जळून भस्म झाली आहेत. मी शुद्ध झालो आहे. पावन झालो आहे. माझे माता-पिता-गुरु सर्व काही आता तुम्हीच आहात. हा संसार-बायका-मुले हे सर्व अळवावरचे पाणी आहे, हे मला चांगले कळले आहे. ही सारी माया खोटी आहे. मी निरीच्छ झालो आहे. भगवान शंकराचे पवित्र चरण मी कधी पाहीन असे मला झाले आहे.

             व्याध असे बोलतो आहे तोच आकाशातून दिव्य विमान खाली उतरले, विमानात शिवगण बसलेले होते. त्यांची तेजस्वी कांती झळकत होती. वाघाची कातडी त्या सर्वांच्या अंगावर शोभत होती, चारी दिशांत त्यांचे चकाकणारे तेज मावत नव्हते.

              त्यांच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर अनेक वाद्ये वाजवत होते. यक्ष आपल्या अतिशय कर्णमधुर गोड अशा आवाजात गाणी म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करीत होते.

             हरणांचे सारे कुटुंबही ह्या पुष्प वर्षावात आनंदाने न्हात होते. हळूहळू तेथील सर्व हरणांना आपले यापूर्वीचे मूळ स्वरूप प्राप्त झाले. व्याधाने त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने 'जय जय शिव हर हर' असा जयघोष सुरू केला. परिसाचा स्पर्श होताच ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला. त्याला लगेचच शिवगणांसारखे दिव्यरूप प्राप्त झाले. सर्वच्या सर्व शिवगणांनी मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. रंभासुद्धा आपल्या परिवारासह त्या दिव्य अशा विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करीत होते. व्याधाला शंकराच्या पवित्र जागा मिळाली, अक्षय स्थान मिळाले. आजही आकाशात आपल्याला तीन हरिणी व एक हरिण अशी चार हरणे आणि व्याधाची एक चांदणी आपल्या तेजाने तळपताना दिसतात.

              अशी ही व्याधाची कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार मोठे आहे. कथा ऐकणाऱ्याची सर्व पापे ताबडतोब जळून नाहीशी होतात. कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणाभोवती भुंग्याप्रमाणे एकसारखी रुंजी घालून शिवनामाचा अवर्णनीय सुंगध कवी श्रीधर यास प्राप्त झाला आहे. अशी ही स्कंदपुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी म्हणजे त्याचे अतिशय उत्तम प्रकारचे फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.

अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या